दौलताबाद/देवगिरी

दौलताबाद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. इ,स, १२९६ मध्ये अल्ला‍उद्दिन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला. आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना प्रायः दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दिनाच्या कार्याची पूर्ती केली. आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.





 


अल्ला‍उद्दिनाचे अनुकरण मुहम्मद तुघलक (इ. स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत प्रस्थापित केली. मात्र दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहमनी याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहमनी घराण्याची स्थापना झाली ती सुमारे १५० वर्षे टिकली. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहमनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहमनी राज्याचे गोवळकोंड्याची कुत्बशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर सहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाच शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या.
Category: 0 comments

वेरूळ

महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात औरंगाबाद शहरापासून ३० किलो मीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगांव आहे. येथे प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरुळ आहे.

इतिहास

वेरूळची लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात.

रचना

वेरूळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागणी केली जाते.

हिंदू लेणी

वेरूळच्या हिंदू लेण्यांची शैली इतर लेण्यांपेक्षा अगदी वेगळी आहे. ही लेणी म्हणजे शिल्पकारांनी कातळात कोरलेली अतिप्रचंड शिल्पेच आहेत. यातील बरीचशी लेणी वरपासून सुरू कून खालपर्यंत कोरीवकाम करीत निर्मिलेली आहेत. असे शिल्प किंवा बांधकाम करण्यासाठी शिल्पकार/कारागीरांच्या अनेक पिढ्या खर्ची पडल्याचा उल्लेख आहे.
कैलास मंदिर

वेरुळचे कैलास मंदिर
वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. ते मंदिर निर्माण करायला अंदाजे २ लाख टन वजनाचा एका अखंड खडक वापरण्यात आला असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आला असला पाहिजे आणि ते प्रचंड खोदकाम/कोरीवकाम पुरे व्हायला कित्येक दशके लागली असणार. ह्या मंदिराच्या निर्मितीमागचे असामान्य शिल्पज्ञान आणि निर्मितीमागची असामान्य शिल्पकला ह्या गोष्टी हजार-दीडहजार वर्षांपूर्वी ज्या माणसांना अवगत होत्या त्यांची नावेही इतिहासात कोणी नोंदवलेली नाहीत!
घृष्णेश्वर मंदिर
वेरूळ लेण्यांपासून जवळच हे मंदिर आहे. महाराष्ट्रातील १२ ज्योतीर्लिंगांपैकी हे शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिध्द आहे.

बौद्ध लेणी

वेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही लेणी मुख्यत्त्वे विहार रूपाची आहेत. काही विहारांतून पूजेसाठी मूर्तीही आहेत.
यांपैकी प्रसिद्ध लेणे म्हणजे विश्वकर्मा लेणे. अनेकमजली प्रवेशद्वारातून आत गेल्यावर तेथे स्तूप आहे. या स्तूपाच्या वरच्या भागातील दगड असा कोरलेला आहे की असे वाटावे जणू लाकडी वासेच. या स्तूपात बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील मूर्ती आहे.

जैन लेणी

वेरूळची जैन लेणी तुलनेने लहान आहेत व जैन धर्माची वैराग्यभावना दर्शवितात. याबरोबरच बारीक कोरीव काम व चित्रे ही या लेण्यांची वैशिष्ट्ये आहेत.

लेण्यांना भेट देण्याकरता उपलब्ध मार्ग

रस्ता मार्गे

औरंगाबाद शहर मुंबई, नागपूर, पुणे वगैरे अनेक शहरांशी राज्य महामार्गने जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ औरंगाबाद ते मुंबई दरम्यान आरामगाड्या चालवते (अंतर सुमारे ३९२ कि.मी.).

लोहमार्गे (रेल्वे)

औरंगाबादकडून मुंबई, आग्रा, दिल्ली, भोपाळ, हैदराबाद ह्या शहरांकडे थेट लोहमार्ग आहेत. हिवाळ्यात डेक्कन ओडिसी ही खास रेल्वे अभ्यागतांना औरंगाबाद(अजिंठा-वेरूळ)ची सफर घडवते.
चाळीसगांव, मनमाड, परभणी, पूर्णा आणि नांदेड या रेल्वे स्थानकांवर उतरुन रस्तामार्गे औरंगाबादला जाणेही शक्य आहे.

विमान मार्गे

औरंगाबादहून ३० कि.मी. अंतरावर चिकलठाणा गावी एक विमानतळ आहे. मुंबई-दिल्ली-जयपूर-उदयपुर आणि औरंगाबाद ह्या शहरांमधे सध्या विमानांची येजा असते.

लेण्यांना भेट देण्याकरता सगळ्यात चांगला कालावधी

उन्हाळ्याचे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने सोडून वर्षातला इतर नऊ महिन्यांचा कालावधी लेण्यांना भेट देण्याकरता चांगला असतो. उन्हाळ्यात त्या परिसराचे सरासरी तपमान ४०-४४ सेल्सिअस (१०४-११२ फॅरनहाइट) अंशांपर्यंत जात असल्यामुळे त्या काळात प्रवास दगदगीचा होऊ शकतो.

लेणी पहायची वेळ

सोमवार आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचे दिवस सोडून इतर दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अभ्यागतांनी पहाण्याकरता लेणी उघडी असतात.
Category: 0 comments

अजिंठा लेणी

अजिंठा-वेरूळची लेणी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन कालात निर्मिलेली लेणी आहेत. ही लेणी त्यांच्या स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत.

इतिहास

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान उपलब्ध व्हावे असा असे. सोबतच त्यांना राजाश्रय, धर्माश्रय, लोकाश्रय प्राप्त असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. वेळ जाता तिचे रूपांतर एक नितांतसुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनांत झाले. परंतु या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षणसंस्थेसारखी आहे.

पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी 'हीनयान कालखंडात' कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसर्‍या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून 'बुद्धाचे' दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) 'महायान कालखंडात' निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बर्‍याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

वाकाटक साम्राज्याच्या र्‍हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली.

रचना

अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. लेणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.

हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही 'चैत्यगृह' आहेत व १२, १३, आणि १५-अ क्रमांकाचे लेणे 'विहार' आहे. महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.

विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली. बर्‍याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.


लेण्यांना भेट देण्याकरता उपलब्ध मार्ग

रस्ता मार्गे

औरंगाबाद शहर मुंबई, नागपूर, पुणे वगैरे अनेक शहरांशी राज्य महामार्गने जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ औरंगाबाद ते मुंबई दरम्यान आरामगाड्या चालवते (अंतर सुमारे ३९२ कि.मी.).

लोहमार्गे (रेल्वे)

औरंगाबादकडून मुंबई, आग्रा, दिल्ली, भोपाळ, हैदराबाद ह्या शहरांकडे थेट लोहमार्ग आहेत. हिवाळ्यात डेक्कन ओडिसी ही खास रेल्वे अभ्यागतांना औरंगाबाद(अजिंठा-वेरूळ)ची सफर घडवते.

चाळीसगांव, मनमाड, परभणी, पूर्णा आणि नांदेड या रेल्वे स्थानकांवर उतरुन रस्तामार्गे औरंगाबादला जाणेही शक्य आहे.

विमान मार्गे

औरंगाबादहून ३० कि.मी. अंतरावर चिकलठाणा गावी एक विमानतळ आहे. मुंबई-दिल्ली-जयपूर-उदयपुर आणि औरंगाबाद ह्या शहरांमधे सध्या विमानांची येजा असते.

लेण्यांना भेट देण्याकरता सगळ्यात चांगला कालावधी

उन्हाळ्याचे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने सोडून वर्षातला इतर नऊ महिन्यांचा कालावधी लेण्यांना भेट देण्याकरता चांगला असतो. उन्हाळ्यात त्या परिसराचे सरासरी तपमान ४०-४४ सेल्सिअस (१०४-११२ फॅरनहाइट) अंशांपर्यंत जात असल्यामुळे त्या काळात प्रवास दगदगीचा होऊ शकतो.

लेणी पहायची वेळ

सोमवार आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचे दिवस सोडून इतर दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अभ्यागतांनी पहाण्याकरता लेणी उघडी असतात.

Category: 0 comments