अजिंठा लेणी

अजिंठा-वेरूळची लेणी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन कालात निर्मिलेली लेणी आहेत. ही लेणी त्यांच्या स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत.

इतिहास

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान उपलब्ध व्हावे असा असे. सोबतच त्यांना राजाश्रय, धर्माश्रय, लोकाश्रय प्राप्त असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. वेळ जाता तिचे रूपांतर एक नितांतसुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनांत झाले. परंतु या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षणसंस्थेसारखी आहे.

पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी 'हीनयान कालखंडात' कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसर्‍या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून 'बुद्धाचे' दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) 'महायान कालखंडात' निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बर्‍याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

वाकाटक साम्राज्याच्या र्‍हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली.

रचना

अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. लेणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.

हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही 'चैत्यगृह' आहेत व १२, १३, आणि १५-अ क्रमांकाचे लेणे 'विहार' आहे. महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.

विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली. बर्‍याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.


लेण्यांना भेट देण्याकरता उपलब्ध मार्ग

रस्ता मार्गे

औरंगाबाद शहर मुंबई, नागपूर, पुणे वगैरे अनेक शहरांशी राज्य महामार्गने जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ औरंगाबाद ते मुंबई दरम्यान आरामगाड्या चालवते (अंतर सुमारे ३९२ कि.मी.).

लोहमार्गे (रेल्वे)

औरंगाबादकडून मुंबई, आग्रा, दिल्ली, भोपाळ, हैदराबाद ह्या शहरांकडे थेट लोहमार्ग आहेत. हिवाळ्यात डेक्कन ओडिसी ही खास रेल्वे अभ्यागतांना औरंगाबाद(अजिंठा-वेरूळ)ची सफर घडवते.

चाळीसगांव, मनमाड, परभणी, पूर्णा आणि नांदेड या रेल्वे स्थानकांवर उतरुन रस्तामार्गे औरंगाबादला जाणेही शक्य आहे.

विमान मार्गे

औरंगाबादहून ३० कि.मी. अंतरावर चिकलठाणा गावी एक विमानतळ आहे. मुंबई-दिल्ली-जयपूर-उदयपुर आणि औरंगाबाद ह्या शहरांमधे सध्या विमानांची येजा असते.

लेण्यांना भेट देण्याकरता सगळ्यात चांगला कालावधी

उन्हाळ्याचे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने सोडून वर्षातला इतर नऊ महिन्यांचा कालावधी लेण्यांना भेट देण्याकरता चांगला असतो. उन्हाळ्यात त्या परिसराचे सरासरी तपमान ४०-४४ सेल्सिअस (१०४-११२ फॅरनहाइट) अंशांपर्यंत जात असल्यामुळे त्या काळात प्रवास दगदगीचा होऊ शकतो.

लेणी पहायची वेळ

सोमवार आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचे दिवस सोडून इतर दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अभ्यागतांनी पहाण्याकरता लेणी उघडी असतात.

Category: 0 comments

No comments:

Post a Comment